PRAJASHILP digital
नांदेड :मार्च महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा या मागणीसाठी राज्य व देशपातळीवरील नेत्यांना सातत्याने निवेदने देऊन, भेटी घेऊन प्रयत्न चालू असून काल नांदेड येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षात ही मागणी पूर्ण करावी अशी विनंती या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर यांनी केली आहे.
जगाच्या इतिहासात सर्वप्रथम सर्व मनुष्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड (जि. रायगड) येथे पार पडलेला ‘चवदार तळे सत्याग्रह’ हा भारताच्या सामाजिक समतेच्या इतिहासातील एक क्रांतिकारक प्रसंग आहे. या दिवशी प्रथमच अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या तळ्यावर समान हक्काने प्रवेश मिळाला. हा दिवस भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचा पाया घालणारा म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे. सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष शासन स्तरावर साजरे होईल अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. तथापि अद्याप कोणतेही ठोस कार्यक्रम घेण्यात आले नसल्याचे दिसत आहे. जागतिक जल दिन (World Water Day) ची स्थापना संयुक्त राष्ट्रांच्या (UN) आमसभेने १९९२ मध्ये रियो दी जानेरो येथे झालेल्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) घेतलेल्या निर्णयानुसार २२ डिसेंबर १९९२ रोजी ठराव संमत करून केली आणि पहिला जागतिक जल दिन २२ मार्च १९९३ रोजी साजरा करण्यात आले . गोड्या पाण्याचे महत्त्व सांगणे, पिण्याच्या पाण्याच्या जागतिक संकटाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, पाण्याच्या स्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी पावले उचलणे आहे. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी पिण्याच्या पाण्याची विश्वाच्या इतिहासात सर्वप्रथम केली त्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद होणे हे अत्यंत आवश्यक आहे -महेन्द्र पिंपळगावकर
20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा याकरीता महेंद्र पिंपळगावकर यांनी मागील दोन ते अडीच वर्षापासून आपले प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. जेष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार, खा. असददोद्दीन ओवेसी, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खा.डॉ. ज्योतीताई वाघमारे, वंचितच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या मागणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यांनी देखील या प्रश्नी आपापल्या स्तरावर प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. वेगवेगळ्या धम्म परिषदा, साहित्य संमेलनातून राष्ट्रीय जलदिन व्हावा असा ठराव घेण्यात आला.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदासजी आठवले हे नांदेड येथे आले असता पिंपळगावकर यांनी त्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. त्यावर ना. आठवले यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे, नगरसेवक प्र. राजू लांडगे, विशाल सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

