Prajashilp digital ,
देगलूरः देगलूर शहराच्या विकासासोबतच व्यापार आणि रोजगाराच्या भवितव्याबाबत प्रश्न उभा राहिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग देगलूर शहराबाहेरून कारेगाव–बागनटाकळी बायपास मार्गे नेण्याचा प्रस्ताव असेल, तर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील बाजारपेठ, छोटे-मोठे व्यापारी, स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उदगीर विधानसभेचे आमदार यांनी स्वतः लातुर - रेणापूर- उदगीर - देगलूर राष्ट्रीय महामार्ग उदगीर शहराच्या मध्य भागातून नेला.पण हाच रस्ता देगलूर शहराच्या मुख्य भागातून टाकण्यास विरोध उदगीरचे आमदार बनसोडे करीत आहेत काय?
दरम्यान, प्रस्तावित महामार्गाच्या मार्गात नगरपालिका सत्ताधाऱ्यांशी तसेच भारतीय जनता पक्षाच्या माजी नगराध्यक्षांशी संबंधित कोट्यवधी रुपयांची जमीन येत असल्याची शहरात चर्चा सुरू आहे.
यासोबतच देगलूर नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे यांच्या भूमिकेबाबतही शहरात विविध चर्चा रंगल्या आहेत.
काही व्यक्तींच्या जमिनी वाचवण्यासाठी महामार्गाचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आहे. मात्र या सर्व चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे अधिकृत कागदपत्रे, प्रस्तावित आराखडा आणि प्रशासनाच्या अंतिम निर्णयातूनच स्पष्ट होणार आहे.
पण नागरिकांसमोर एक प्रश्न मात्र थेट उभा आहे—
उदगीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असेल, तर देगलूरलाच बायपासची गरज का?
महामार्ग शहरातून गेला, तर वाहतुकीसोबतच शहरातील व्यापाराला चालना मिळू शकते. दुसरीकडे बायपास झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल; मात्र शहरातील बाजारपेठेवर त्याचा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता या संपूर्ण विषयात खासदार अभिजित गोपछडे यांनी देगलूरच्या नागरिकांची भूमिका जाणून घेतली आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
तर दुसरीकडे, स्थानिक आमदार जितेश अंतापुरकर या मुद्द्यावर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे देगलूरकरांचे लक्ष लागले आहे. ते शहराचा व्यापार, विकास आणि नागरिकांच्या हितासाठी आवाज उठवणार का? असाही प्रश्न उपस्थित होतो .

