PRAJASHILP digital ,
देगलूरः लेंडी आंतरराज्य प्रकल्पांतर्गत रावणगाव येथील पुनर्वसन गाव खानापूर येथील चार प्रकल्पग्रस्तांना हक्काचा भूखंड मिळावा, यासाठी उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.
खानापूर येथील रहिवासी हरिबा धोंडीबा फिरंगवाड, प्रकाश बालाप्रसाद श्रीवास्तव, प्रेमलाल दुर्गाप्रसाद श्रीवास्तव व राधेश्याम हरिप्रसाद श्रीवास्तव हे गेल्या ७ दिवसांपासून उप जिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर येथे आमरण उपोषणास बसले होते. उपोषणामुळे आंदोलकांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रावणगावचे सरपंच पप्पू हसणाळे आणि नगरसेवक लालू कोयलावार यांनी ही बाब रामदास पाटील सुमठाणकर यांच्या निदर्शनास आणून दिली. सुमठाणकर यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) अनुप पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली व हा प्रश्न तातडीने सोडवण्याची आग्रही विनंती केली.
सुमठाणकर यांच्या पुढाकारानंतर प्रशासनाने तात्काळ उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली. प्रशासनाकडून भूखंड वाटपाबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानंतर समाधान व्यक्त करत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले.
याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू पाटील, नगरसेवक लालू कोयलावार, सरपंच पप्पू हसणाळे, सुभाष कदम, परवेज शेख, माधव पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
