PRAJASHILP digital
देगलूर : शहरातील जुना बस स्टँड परिसरात मिठाई घरच्या समोर थोड्याशा पावसाने रस्त्यावर पाणी साचत असल्याचे नगरपालिकेला दिसत आहे की नाही? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे . या रस्त्याच्या दुतर्फा भली मोठी नाली असून सुद्धा पावसाचे पाणी भर रस्त्यात साचत असल्याने एखादे वाहन गेल्यास हे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्यामुळे नागरिकांचे अनेकदा कपडे खराब होऊन कुचंबना होत असल्याचे निदर्शनास येत आहे . त्यामुळे पालिकेच्या डोळ्यात काय माती पडली की काय ? असा सवाल या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी केली आहे .
नगरपालिका प्रशासनाचे मुख्य असलेले मुख्याधिकारी यांना देगलूर शहरातील स्वच्छतेच्या विषयी , पाण्याचा निचरा, तुंबलेले नाल्या आणि चौका चौकात साचलेला कचरा याविषयी काही देणे घेणे नाही . त्यांना केवळ आपली टक्केवारी मजबूत करण्याचे काम येथील मुख्याधिकारी करीत असल्याची अनेकदा सामान्य नागरिक बोलून दाखविले आहेत . त्यामुळे नगरपालिकेचा कारभार हा मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्या हातात जरी असला तरीही ते केवळ आपली टक्केवारी आणि ठेकेदाराची गुलामी करण्यातच सौजन्य सामावलेली व्यक्ती आहे अशी टीका नागरिक करीत आहेत .
देगलूर शहरातील मातृ संस्था म्हणजेच नगरपालिका या नगरपालिकेने आजपर्यंत अनेकदा स्वच्छता विषयी पुरस्कार पटकावून आपले उर बडवून घेतले आहे, परंतु वास्तविकतः शहराची बकाल अवस्था राज्यशासनासमोर येतच नाही . शहरातील अत्यंत गडबडीचे ठिकाण आणि वर्दळीचे ठिकाण म्हणून जुना बस स्थानक परिसर लक्षात येतो परंतु या परिसरात थोड्याशा पावसाने सुद्धा रस्त्यावरपाणी साचत असल्यामुळे सदरील पाण्यातून रस्ता ओलांडणे किंवा त्या रस्त्यावर चालणे नागरिकांना दुरापास्त झाले आहे . या भागातील मिठाई घर, मेडिकल आणि बियर बार तसेच पाणीपुरी व दुध विक्रेत्यांनी ऐन नालीवर मुरूम टाकून आपले दुकानासमोरील जागा उंच केली आहे . त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी पडल्यास त्या ठिकाणी खूप मोठे डबके साचत आहे .या डबक्यातून येजा करणाऱ्या नागरिकांना तारावरची कसरत करावी लागते .
याशिवाय जुना बस स्थानकातून एसटी किंवा चार चाकी वाहन गेल्यास या डबक्यातील पाणी सामान्य नागरिकांच्या अंगावर पडते त्यामुळे अनेकदा महिला, युवती- युवक आणि सामान्य नागरिक या रस्त्यावरून ये - जा करण्यास धजावत नाहीत . अनेकदा नागरिक या डबक्याविषयी साचलेल्या पाण्यातून रस्ता काढत नगरपरिषदेच्या डोळ्यात काय माती पडली की काय ? हे त्यांना दिसत आहे की नाही असा सवाल करीत पालिकेला शिव्या शाप देत आहेत .
या भागात आणि मुख्य रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा अशी मागणी देगलूर शहरातील सर्व नागरिकांनी अनेकदा बोलून दाखवली आहे . या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि चिखल होत असल्याने या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना अत्यंत हेळसांड होत असून डबक्यातून रस्ता काढणे नागरिकांना तारावरची कसरत ठरलेली दिसून येते .
