PRAJASHILP digital -
देगलूर : शहर आणि लगतच्या भागात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिजाचे ( मुरूम) अवैध उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाची रीतसर परवानगी तर घेतली पण परवानगी पेक्षा चार ते पाच पट उत्खनन करून बिनधास्त शहरात वाहतूक सुरू आहे .दिवस-रात्र यंत्रसामग्रीच्या साहाय्याने हे खाणकाम सुरू असून, याकडे महसुल प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करीत वैयक्तिक हित साधत असल्याचे बोलले जात आहे. यात मात्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तर ग्रामीण भागातील पर्यावरणाचा ऱ्हास हा गाव खेड्यातील जिवावर उठणारा ठरणारा आहे असा सुर उमटत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, देगलूर शहराच्या लगतच्या ग्रामिण भागातील शासकीय गायरान जमिनी तसेच टेकड्यांच्या परिसरात मुरूम माफियांनी धुमाकूळ घातला आहे. थातूर मातूर प्रकारचा परवाना काढून पोकलेन, जेसीबी आणि हायवा डंपरच्या साहाय्याने चार ते पाच पट नियमबाह्य उपसा व वाहतूक केली जात आहे. त्यामुळे दोन गावामधिल सीमा किंवा वेस नेस्तनाबूत होत असून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. बेसुमार उत्खननामुळे नैसर्गिक समतोल बिघडत असून भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावत आहे. तर पावसाच्या पाण्याचा अडसर दूर होवून वेगात पाणी वाहत शेता शिवारात घुसून पिकें आडवी होत आहेत .
शिवाय, क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) वजन वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे गावातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या अनधिकृत डंपर व ट्रकांमुळे लहान मुले व पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या बेकायदेशीर व्यवसायाबाबत स्थानिकांनी महसूल व पोलीस प्रशासन भू खनिज माफियांचे हस्तक असल्यागत वागत असल्याने कोणाकडे दाद मागावी असा सवाल करीत आहेत. अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस किंवा कडक कारवाई करण्यात आलेली नाही. महसूल विभागाच्या या संशयास्पद मौनामुळे खनिज माफियांचे धाडस आणखी वाढले असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून केले जात आहेत.
